समाजसेवेचं सेतू बांधणारे व्यक्तीमत्व म्हणजे 'डॉ. लक्ष्मणराव कारले'
(वाढदिवस विशेषलेख - पत्रकार मेघराज किलजे,जळकोट)
सत्य युगातील रामायणात प्रभू रामचंद्र यांनी रावणाच्या लंकेत प्रवेश करण्यासाठी सागरी सेतू बांधला. संपूर्ण रामायणात प्रभू श्रीरामचंद्रांच्या पाठीशी बंधू लक्ष्मण खंबीरपणे उभे राहून प्रत्येक प्रसंगी भावाची साथ दिली. त्यामुळेच सागरी सेतू निर्माण करून प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला. हे सत्य युगात सत्य असले, तरीही सध्याच्या युगात प्रत्येक रुग्णाशी सामाजिक बांधिलकीतून सर्वांना भावा समान मानून समाजाबरोबर समाजसेवेचं सेतू बांधणारे .. रामायणातील लक्ष्मण प्रमाणे प्रत्येकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे डॉ. लक्ष्मणराव कारले यांचे व्यक्तिमत्व आताच्या युगात आदर्शवत आहे. सागरी सेतूप्रमाणे एकेक समाजसेवेचा सेतू निर्माण करणारे डॉ. लक्ष्मणराव कारले यांच्या वैद्यकीय व समाजसेवेमुळे अनेक कुटुंब आनंदाने जगत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
धाराशिव जिल्ह्यातील दस्तापूर पांढरी(ता. लोहारा) येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. लक्ष्मणराव करले यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात दि.४ मे १९५० साली झाला. समाजात असे फार थोडे लोक आहेत जे आपल्या प्रोफेशन सोबत समाजहितालाही प्राधान्य देत असतात. त्यापैकीच डॉ. लक्ष्मणराव कारले हे होय. डॉ. कारले हे वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गरिबीतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. सहा भावात हे थोरले आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून एमबीबीएस हि वैद्यकीय पदवी मिळवली. डीसीपी आणि नाक, कान व घसा यामध्ये पदवी प्राप्त केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात १५ वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.३१ मे २००८ रोजी ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी समाजकार्य हाती घेतले. सामाजिक कार्याच्या प्रबळ इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्याने निवृत्तीनंतर प्रवरा मेडिकल कॉलेज, लोणी व माय मर मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे सेवा केली. आरोग्य सेवेतील कोणता तरी उपक्रम घेऊनच ते आपला वाढदिवस दरवर्षी साजरा करतात. हाती घेतलेले काम झोकून घेऊन पूर्ण करण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. ते रुग्णाविषयी आत्मीयता जपण्याचे काम करत आहेत. गरजू रुग्णांना शक्य तेवढी मदत करणे. मार्गदर्शन करण्यावर त्यांचा भर असतो.
गेल्या वीस वर्षापासून रुग्णसेवा आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. आज पर्यंत रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ब्लड बँकांना पाच लाख युनिट रक्तपुरवठा केला आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारने त्यांचा गौरव केला आहे. संपूर्ण देशाला हादरून टाकलेल्या १९९३ च्या किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत त्यांनी तात्काळ धाव घेऊन, भूकंपातील जखमेवर उपचार केले. त्यांचे अश्रू पुसण्यचे काम केले .
याबरोबरच कोरोना काळात सामाजिक, अध्यात्मिक व धार्मिक या क्षेत्रामध्येही त्यांनी विविध प्रकारे मदत करीत उल्लेखनीय काम केले आहे. गरीब व गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार व सेवा देण्याचे कार्य ते सतत करत असतात. कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली असलेल्या गरिबांना घरी जाऊन अल्प दरात औषधोपचार देण्याचे महान कामही त्यांनी केले आहे. अनेक जीर्ण आजार झालेल्या रुग्णांना बरं करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. या वयात हे त्यांनी केवळ गरीब गरजू रुग्णांना व गरोदर महिलांना रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने खालुम्ब्रे येथे श्रद्धा हेल्थकेअर दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करीत आहेत. दवाखान्यात निशुल्क सेवा मिळत असल्याने अनेक गरिबांना रुग्णालय संजीवन ठरत आहे. रुग्णावर उपचार करण्याबरोबरच त्यांना भावनिक आधार मिळतो. चिंता मुक्त होण्यास मदत होते. बरे करण्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. डॉक्टर म्हणून रुग्णांच्या निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यास डॉ. लक्ष्मणराव कारले प्राधान्य देत असतात. रुग्णांमध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. त्याप्रमाणे ते त्या दिशेने सतत वाटचाल करत आहेत.
गेल्या ४० वर्षाचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असलेले प्रख्यात तज्ञ डॉ. लक्ष्मणराव कारले हे सेवा देत आहेत. यामध्ये छोटे ऑपरेशन , ड्रेसिंग, रक्त तपासणी, लोकांचे आरोग्य, युवकांचे आरोग्य, गरोदर मातांची तपासणी, जुन्या आजारावर उपाय, आहाराविषयी सल्ला, स्त्रीरोग तपासणी, गुप्तरोग तपासणी, बालरोग तपासणी, न्याय वैद्यकीय प्रमाणपत्र व सल्ला देणे, कान, नाक व घसा आजारावर सल्ला देणे, वयोवृद्ध लोकांचे आजार व तपासणी, योग साधना व त्याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. सामाजिक बांधिलकीतून मागील वीस वर्षापासून मोफत निदान, औषधोपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करत असतात.
आरोग्यसेवा व रुग्णसेवा आणि समाजहितासाठी महत्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन डॉ. लक्ष्मणराव कारले यांचा समाजाच्या विविध स्तरातून विविध पुरस्कार देऊन आत्तापर्यंत गौरव करण्यात आला आहे. नॅशनल ब्लाइंडनेस कंट्रोल अवॉर्ड, लाईफ प्राईड अवॉर्ड, आरोग्य रत्न , कोरोना योद्धा, आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ , महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने देण्यात येणारा बाबा आमटे शांतिभूषण पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड यांच्यातर्फे डॉ. लक्ष्मणराव कारले यांना आरोग्यसेवा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय स्थानिक पातळीवरील अनेक सेवाभावी संस्थेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
एकंदरीत डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात आत्तापर्यंत नोंद घेण्यासारखे काम केले आहे. याहीपुढे अविरत त्यांची समाजसेवा सुरू राहणार आहे. या वयात ही तरुणांना लाजवेल असे काम उत्साहाने करत असतात. खरंतर सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करायला हवा. असे कार्य त्यांच्या हातून घडले आहे. हि आनंदाची बातमी ऐकण्यासाठी अनेक हितचिंतक आतूर झाले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रात माणसं जोडून समाजसेवेचा सेतू बांधणारे हे अलौकिक व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वास त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आपणा सर्वांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ यात....!