लोहारा तालुक्यातील येणेगुर,आष्टा कासार,जेवळी,दाळिंब परिसराला अवकाळी पावसाने झोडपले
जळकोट, प्रतिनिधी दि.१२(मेघराज किलजे)
उमरगा लोहारा तालुक्यातील आष्टा (कासार ), भोसगा, पांढरी , जेवळी, येणेगुर, दाळिंब व दस्तापुर परिसराला अवकाळी पावसाने रविवारी दुपारी दीडच्या सुमारास पावसाने झोडपून काढले. या भागाला तुफान झाल्याने नदीला पाणी आले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे.
रविवारी दुपारी एक वाजल्यापासून सोसायट्याचा वारा सुटून आकाशात काळे ढग जमून आले. बघता - बघता तुफान पावसाला सुरुवात झाली. दीड दोन तास पावसाची रिपरीप सुरू होती. कडक उन्हाळ्यात तुफान पाऊस झाल्याने नाले, नद्या भरून वाहिल्या. पाणीटंचाई असलेल्या गावाची या पावसामुळे तहान भागली आहे. या पावसामुळे फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. इतर फळ पिकांचे नुकसान झाले आहे. या भागातील गावागावातील शिवार पाण्याने जलमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. येणेगुर येथील नदीला पाणी आले आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र या भागात पहावयास मिळाले. या पावसामुळे मुंबई- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. खरीप हंगामासाठी पेरणी पूर्व मशागत करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे. या वर्षाच्या कडक उन्हामुळे अंगाची लाही - लाही होत आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वडगाव, फणेपुर, मानमोडी आदि भागातही पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळ पिकांचे व उन्हाळी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.