अक्कलकोट रस्ता ठरतोय मृत्यूला आमंत्रण...!पावसाळयापूर्वी डांबरीकरणाची मागणी
जळकोट, प्रतिनिधी दि.११(मेघराज किलजे)
नळदुर्ग ते वागदरी, गुजनूर ,शहापूर व गुळहळ्ळी (ता.तुळजापूर) पर्यंत ज्या- ज्या ठिकाणी रस्त्याचे काम प्रलंबित आहे .त्या - त्या ठिकाणी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून ,या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे एक प्रकारे मृत्यूला आमंत्रणच ठरत आहे.
या बाबत माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते वागदरी पाटीमार्गे अक्कलकोट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गचे काम जमीनीचा मावेजा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.ज्या - ज्या ठिकाणी रस्त्याचे काम प्रलंबित आहे.त्या - त्या ठिकाणी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे .हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे वाहन चालक व प्रवाशांना एकप्रकारे मृत्यूचे आमंत्रणच म्हणावे लागेल?कारण नुकतचं नळदुर्गपासुन अवघ्या १ कि.मी.अंतरापासून खराब रस्ता सुरु होतो. त्याच ठिकाणी गणेश खिळा गणपती मंदिरा जवळ एका दुचाकी चालकाचा दगडावरुन गाडी घसरून झालेल्या अपघातामुळे जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यापुर्वीही अनेकदा या रस्त्यावर अनेक दुचाकी तीनचाकी व चारचाकी वाहन चालक अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.या राष्ट्रीय महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी न्याय प्रविष्ट केल्याने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तात्पुरती उपाययोजना म्हणून नळदुर्ग ते अक्कलकोट पु्र्वी आस्थित्वात असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, डांबरीकरणाच्या कामाला सुरुवातही करण्यात आली होती.परंतु याही कामाला शेतकऱ्यांनी खोडा घातला आहे.त्यामुळे शेतकरी, गुत्तेदार व शासन यांच्या विरुद्ध प्रवाशी ,ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पावसाळ्यातील अत्यंत जीवघेण्या अनुभवामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग,येडोळा,नाईकनगर, पाटील तांडा,वागदरी, दहिटणा,गुजनूर, शहापूर,गुळहळ्ळी आदी गावातील प्रवाशी ग्रामस्थांतून होत आहे.