ओम नाद घुमणार की... अर्चनाताईंच्या साधनेला पसंती...!
जळकोट, प्रतिनिधी दि.१३(मेघराज किलजे)
धाराशिव जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीची रणभूमी रखरखत्या उन्हात प्रचाराने ताऊन सुलाखून निघाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात तुल्यबळ लढत पाहावयास मिळाली आहे. यामध्ये महाविजय कोणाचा होणार ? यावर चर्चा रंगत आहे. महायुतीकडून अर्चनाताई पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकनिष्ठ राहून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात राहून गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा ओमरूपी विजयाचा नाद घुमणार ..की... राजकीय घराणा असलेल्या राज्याचे माजी मंत्री पदमसिंह पाटील व माजी राज्यमंत्री, तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषद बरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अर्चनाताई पाटील यांनी जिल्ह्यात विकासाची एक आराधना निर्माण केली आहे. त्यांची सामाजिक व राजकीय साधना लोकांना पसंत पडून त्या विजयावर आरूढ होतील का ? याबाबत राजकीय वर्तुळात व गावागावात चर्चा सुरू आहे.
यंदाची लोकसभा निवडणुक गेल्या लोकसभेच्या तुलनेत अधिक जोरदार पहावयास मिळाली. उन्हाळ्याच्या प्रखर उन्हात लोकसभेचे रणांगण पेटले होते. महायुती व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचारात अक्षरशः घाम फुटला होता. प्रचाराने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय रणांगण तापमानाच्या पाऱ्याप्रमाणे कडक झाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथा होऊन शिवसेना ,राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाशी जुळवून घेऊन वेगळी राजकीय समीकरणे मांडली असल्याने , लोकसभा निवडणुकीत जुळवाजुळवीचे समीकरण व फाटाफुटीचे समीकरण पहावयास मिळाले. लोकसभेच्या गेल्या वेळेसच्या निवडणुकीत प्रचारात असलेले विरोधात दिसत होते. तर विरोधात असलेले प्रचारात दिसत होते. त्यामुळे बाजू पलटीचा खेळ कोणाच्या पथ्यावर पडणार ? हे निकालानंतर पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर खासदार म्हणून लोकसभेत गेले. गेल्या पाच वर्षात त्यानी केलेले काम सर्वसामान्य लोकांना पसंत पडले आहे. सर्वसामान्यांच्या एका फोनवर अधिकाऱ्यांना तातडीने फैलावर घेऊन काम करण्याची लकब ओमराजेनी दाखवून दिली. यामुळे साहजिकच त्यांना लोकसभेची महाविकास आघाडीची उमेदवारी विनाविरोध मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्रपक्ष तर शेवटपर्यंत उमेदवारीचा सस्पेंस महायुतीत पहावयास मिळाला. महायूतीकडून अनेक नावे चर्चेत होती. बसवराज पाटील ,सुरेश बिराजदार, धनंजय सावंत, राणाजगजीतसिंह पाटील आदि नावे चर्चेत असताना, ज्यांनी धाराशीव जिल्ह्यात जिल्हा परिषद, लेडीज क्लबच्या माध्यमातून सतत सामाजिक व राजकीय वातावरण तयार करुन चर्चेत राहिलेल्या व राजकीय घराण्याचा वारसा असलेल्या अर्चनाताई पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटात प्रवेश करून राजकीय पटलावरील एक प्यादा अर्चनाताईने पुढे सरसावला. त्यामुळे निवडणूक लढतही तुल्यबळ झाली. राजकीय प्रचाराचा धुराळा शहर ,गाव , वाडीवस्त्यावर उडाला. महाविकास आघाडी व महायूतीकडून घरोघरी प्रचार करण्यावर जोर देण्यात आला. महायूतीकडून पंतप्रधान मोदी यांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी व राहिलेले विकास काम करण्यासाठी मते मागण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून फोडाफोडीचे राजकारण करून भाजप सत्ता हस्तगत करत आहे. लोकशाही टिकवण्यासाठी मतांची मागणी केली. तर महाविकास आघाडी व महायूतीकडून दिगज नेत्यांच्या सभा घेऊन जिल्ह्याच्या विकासाच्या राजकारणावर गप्पा मारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री धनंजय मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अनेक आजी-माजी मंत्री , आजी - माजी आमदार , प्रदेश पातळीवरील पदाधिकारी यांनी आपापल्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्या. परंतु मूळ निवडणुक ही आगळी -वेगळी झाली आहे. मतदारांनीही विचारपूर्वक मतदान केले आहे. देशाचे राजकारण, जिल्ह्याचे राजकारण व राज्याच्या राजकारणाचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला. देशाच्या राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे. महिला ,युवक, शेतकरी यांच्यासाठी लागू असलेल्या योजना ह्या तळागाळापर्यंत पोचल्या असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी हे नेतृत्व सक्षम आहे. हेच देशाचे नेतृत्व करू शकतात. असा सूर काही वर्गाकडून ऐकावयास मिळाला. त्यामुळे अर्चनाताई पाटील यांचा विजय सुकर झाल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. तर भाजप हा पक्ष फोडण्याचे राजकारण करून प्रत्येक नेतृत्व संपवत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील मतदार महाविकास आघाडीकडे वळाल्याचे स्पष्ट जाणवले. राजकीय घडामोडीचा प्रभाव थेट ग्रामीण भागातील घराघरात पोहोचला असल्याचे वातावरण या निवडणुकीत पहावयास मिळाले.
महाविकास आघाडीकडे ओमराजे निंबाळकर हेच स्टार प्रचारक असल्याचे दिसले. स्वतःचा प्रभाव त्यांनी थेट मतदारावर पाडल्याचे दिसून आले. तर महायुतीच्या दिग्गज नेत्यांची फळी अर्चनाताईंच्या प्रचारात दिसून आली. निवडणूक निकाल जून महिन्यात ४ तारखेला लागणार आहे. परंतु विजयाचे अंदाज बांधले जात आहेत. दोन्हीकडून विजयाचा दावा केला जात आहे. या लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयावर उद्याचे जिल्ह्याचे राजकीय भविष्य ठरणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षातील झालेली दुफळीतील दूध का दूध...पाणी का पाणी ... होणार आहे. खरी सेना व खरी राष्ट्रवादी कोण आहे? हे स्पष्ट होणार आहे. काही दिग्गज मंडळींचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीला खूप महत्त्व आहे. खासदार म्हणून लोकसभेत मांडलेले प्रश्न व सामान्य जनतेवर असलेले प्रेम व्यक्त करणारे ओमराजे निंबाळकर यांचा आगामी काळात ओम... नाद ...घुमणार..की ... जिल्ह्याच्या राजकारणात शक्तिस्थान असलेल्या व राजकीय वारसा असलेल्या अर्चनाताई पाटील यांनी जिल्हा परिषद व सामाजिक कार्यातून विकासाची एक साधना केली आहे. या साधनेला विजयाच्या रूपाने पसंती मिळणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळ चर्चेने अवकाळी पावसाप्रमाणे धुवून निघत आहे. या दोघांमध्ये महाविजय कोण साकरणार ? याची चर्चा तळागाळापर्यंत सध्या सुरू आहे.
विशेष राजकीय वार्तापत्र/
मेघराज किलजे, जळकोट.